Thursday, January 24, 2013


आजच सिनेमा पाहिला - जगाच्या पाठीवर. ह्या सिनेमा मधली गाणी खूप ऐकली होती रेडिओवर. आमच्याकडे गाण्यांची कॅसेट पण आहे. काय सुंदर सुंदर गाणी आहेत. त्यामुळे खर तर सिनेमा बघायचा होता. ऐकल पण बरच होत ह्या सिनेमाबद्दल. पटकथा, संवाद, गाणी सब कुछ गदिमा असा सिनेमा आहे. चांगला आहे. सिनेमा मध्ये काही अतार्किक गोष्टी सोडून दिल्या आणि 'असं का?' असा प्रश्न विचारला नाही तर चांगला आहे सिनेमा. सगळ्यांचे अभिनय पण उत्तम. विशेषतः सीमा देव. आणि अर्थातच राजा परांजपे सारख्या दिग्गज माणसाबद्दल काय बोलणार! माडगुळकरान्नी पण काम केला आहे सिनेमामध्ये. इतकी शेकडो (हजारोच खरतर) गाणी लिहिली त्यांनी. सर्व प्रकारची. भक्तिगीते, भावगीते, शृंगारिक गीते.. शुद्ध भाषेत लिहिलं, अशुद्ध भाषेत लिहिलं! त्यांच्याबद्दल माणसाने बोलावं तितकं थोडंच आहे. आत्ता दोनच गोष्टी सांगतो. असं म्हणतात कि
उपमा कालिदासस्य, भारवे: अर्थगौरवं,
दंडीन: पदलालित्यं, माघे सन्ति त्रयोगुण:

माडगुळकरांना काय म्हणणार मग? माझ्या मते भाषाप्रभू! दुसरं काय म्हणणार! सर्व अलंकार अगदी मनसोक्त वापरले आहेत त्यांनी त्यांच्या साहित्यात. रूपक, उपमा, अन्योक्ती.. आपल्याला तर नावं पण आठवणार नाहीत. ऐतिहासिक, पौराणिक गोष्टींचा किती सहज पणे संदर्भ येतो. उदा: राजहंस सांगतो कीर्तीच्या तुझ्या कथा.. गीतरामायण वगैरे तर काय!! बोलणच खुंटलं! एकच शेवटच सांगतो आत्ता.. ह्या माणसाने बैल हा शब्द सुरुवातीला घेऊन गाणं लिहिलं  आहे..!!  'बैल तुझे हरणावाणी...' आत्ता इतकच पुरे.. त्यांच्या साहित्याबद्दल लिहीन पुन्हा केव्हातरी. 

मराठीमधल्या नटांपैकी सगळ्यात handsome नट म्हणजे मी तरी म्हणीन कि अरुण सरनाईक. तरुणपणीची  विक्रम गोखले किंवा राजा गोसावी किंवा रवींद्र महाजनी वगैरे लोकं ठीक आहेत. काहीजण म्हणतील रमेश देव म्हणून. पण handsome म्हणजे अरुण सरनाईक! 'प्रथम तुज पाहता' मधला किंवा 'धुंदी कळ्यांना धुंदी फुलांना' मधला अरुण सरनाईक पहा. सचिन, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे हयंचे सिनेमे मस्त विनोदी होते. दर शनिवारी आणि रविवारी दुपारी लागायचे. काय काय सिनेमे आहेत. निखळ विनोदी. म्हणजे घरातले सगळे एकत्र बसून एन्जोय करू शकतील असे. 'बनवाबनवी' काय किंवा 'आयत्या घरात घरोबा' काय किंवा 'माझा पती करोडपती' काय.. मस्त सिनेमे. बघा आणि पोट धरून हसा.. काय अफ़लातून कामं केली आहेत त्या लोकांनी. काय काय dialogue आहेत! विशेषतः 'बनवाबनवी' मधले! तसेच अजून काही सिनेमे म्हणजे महेश कोठारे आणि लक्ष्मीकांत बेर्डेचे. तो 'व्याख्या विक्खी वूक्खू' वाला तर जबरदस्त आहे. म्हणजे तो हा.. काय बरं त्याच नाव हान..धुमधडाका! तो म्हणजे हिंदिमधल्या 'प्यार किये जा' चा रिमेक आहे. तसाच अजून एक मस्त सिनेमा म्हणजे 'चोरीचा मामला..' गाणं वाला.. ह्या लोकांचे इतरही बरेच आहेत सिनेमे. पण हे मस्त आहेत. हल्लीच्या सिनेमांमधल्या लोकांना तेवढा जमत नाही अस मत होतं माणासाचं हे जुने सिनेमे पाहिल्यावर. 'काय द्याच बोला'  वगैरे पण चांगले आहेत सिनेमे.. 'एक डाव धोबीपछाड' पण मस्त आहे. 'सिंहासन' पण पहिला मी मध्ये. सगळेजण म्हणतात खूपच छान आहे वगैरे..पण मला तरी ठीक च वाटला.. तसाच तो हा पण.. 'सामना'.. ठीक आहे.. काही ठिकाणी तर कशाचा कशाला आगापीछा नाही कथेत..

घरी असताना रेडीओ वर जी ऐकायचो ती सगळी गाणी इंटरनेटमुळे हल्ली ऐकता येतात. दर शनिवारी सकाळी दादा कोंडकेंच 'अंजनीच्या सुता' लागायचं ते ऐकतो. तसच शाळेत असताना सकाळी 'तुझ्या कांतिसम रक्तपताका' ऐकायचो. सकाळची शाळा होती. तेव्हा बरोबर आंघोळीच्या वेळी लागायचं ते गाणं. काय वर्णन केलाय त्यात! 'पाचुमण्यांच्या किरणांसम हि हिरवी दुर्वादळे'!!  पूर्वी सह्याद्री किंवा आकाशवाणीच्या कृपेने ऐकलेली हि अशी सगळी गाणी ऐकतो आता परत परत. 'कीचकवध' वगैरे नुसती नावं ऐकलेल्या सिनेमान्माधली गाणी पण ऐकता येतात. जुने सिनेमे बघता येतात. ह्या links पहा. इथे गाणी आणि सिनेमा-नाटकांचा खजिना आहे.
गाण्यांसाठी: http://www.aathavanitli-gani.com/index.htm
सिनेमा आणि नाटकांसाठी: http://www.umovietv.com/

ह्याच site वरून पहिला मी आज सिनेमा. जगाच्या पाठीवर मधले संवाद चांगले आहेत. काही काही वाक्य छान आहेत. गाणी तर अप्रतिम आणि आशयगर्भसुद्धा... 'जग हे बंदिशाला','एक धागा सुखाचा', 'विकत घेतला श्याम' वगैरे..   'उद्धवा अजब तुझे सरकार' तर कालातीत गाणं आहे. सगळीच गदिमांची आहेत. सुधीर फडक्यांच संगीत आणि त्यांचाच आवाज. तसच अजून एक छान गाणं म्हणजे रफीने म्हणलेलं. 'कुठे शोधिसी..' तेच ऐकत बसतो आता..  लहानपणापासून मराठी सिनेमे पाहिलेत, गाणी ऐकली आहेत, पुस्तकं वाचली आहेत. त्यामुळे मराठी साहित्याबद्दल थोडीफार माहिती आहे. त्यामुळे कितीतरी गोष्टी आहेत लिहिण्यासारख्या.. पण आत्ता राहू दे.. नंतर लिहीन कधीतरी..

No comments:

Post a Comment