Sunday, January 6, 2013

Air India च्या सौजन्याने

सिंगापुरी परत आल्यानंतर गेले ३-४ दिवस आम्ही चारही तंगड्या वर करून लोळत पडलो होतो त्यामुळे हे लिहून blog वर टाकण्यास उशीर झाला. हा सर्व प्रकार १ आणि २ जानेवारीला घडला. १ जानेवारीचे रात्रीचे विमानोड्डाण पुढे ढकलण्यात येउन २ जानेवारीच्या रात्री झाले. त्याची हि गोष्ट.


'सुमेध बाळ येई घरा, तोचि दिवाळी आणि दसरा' असे सुट्टीचे दहा दिवस झाल्यानंतर आम्ही सिंगापुरी परत जाण्यासाठी निघालो. (बऱ्याच गाठीभेटी झाल्या. एक लग्न आणि एक साखरपुडा जेवलो. :-) \m/ ) नेहमीप्रमाणे K K Travels च्या गाडीचे बुकिंग केले होते. गाडी बऱ्यापैकी वेळेवर आली. सगळी शीटं भरलीच होती. आम्ही बसल्यावर गाडी निघाली. द्रुतगती मार्गावर मंदगतीने निवांत प्रवास करत आम्ही मुंबई जवळ आलो. त्यानंतर  'वाहतूक मुरम्ब्यातून' बाहेर पडून एकदाचे विमानतळावर पोहोचलो. COEP चे विद्यार्थी कुठेही भेटतात ह्या नियमाला अनुसरून आमच्या गाडीत देखील अजून एक माजी विद्यार्थी होता. मग काय कॉलेज संदर्भात थोड्याफार गप्पा झाल्या. विमानतळावर हीs भलीमोठी गर्दी होती. तिथले सुरक्षाविषयक सर्व उपचार पार पडल्यानंतर आम्ही बोर्डिंगच्या गेटपाशी जाउन वाट बघत बसलो. थोड्या वेळाने  झोप लागली. काय काय स्वप्न पडली ती काही आता आठवत नाहीत. मधेच जाग आली ती सहप्रवाशांच्या आवाजाने. 'विमान थोडं उशिरा निघेल असं म्हणताहेत. म्हणूनच वेळ उलटून गेली तरी बोर्डिंग सुरु नाही झालं अजून', शेजारच्या खुर्चीने माहिती पुरविली. 'बोर्डिंग सुरु झालं कि उठवा' असं सांगून मी परत झोपलो. एकदम काहीतरी गलका झाला आणि जाग आली. आता तर अगदी विमान निघायची वेळ झाली होती. बघतो तर काय.. Air India चे एक काका आणि काकू काहीतरी उद्घोषणा करण्याच्या तयारीत होते. त्यांनी सांगितले कि विमान २४ तास उशिराने सुटणार आहे. कारण काय तर म्हणे वैमानिक आलाच नाही. (शक्य आहे. कारण Air India च्या कर्मचाऱ्यांना गेल्या २-३ महिन्यांचा पगारच मिळाला नसल्याचे नंतर आम्ही ऐकले. त्यामुळे त्या गोष्टीचा निषेध म्हणून तो आणि त्याचे इतर सहकारी आले नसतील). त्यावर एकच गोंधळ सुरु झाला. सगळ्यांनी त्यांना घेराव घातला. आत्ताच्या आत्ता दुसऱ्या वैमानिकाची सोय करा वगैरे वगैरे मागण्या सुरु झाल्या.हे पाहून आम्हास कॉलेजमध्ये इंजिनीरिंगच्या (विशेषतः गणिताच्या) पेपरात मार्कं वाढवून घेणाऱ्या मंडळींची आठवण आली!


तो गदारोळ सुमारे दोन अडीच तास चालला. लोकं कितीतरी वेळ वाद घालत बसली होती. अर्थातच काही उपयोग नव्हता. लोकांनी शिव्या द्यायला, धमक्या द्यायला सुरुवात केली तरीदेखील ते दोघे तसेच मख्ख चेहेरे करून उभे होते. सरकारी कर्मचारी ते! त्यांच्याशी वाद घालणं म्हणजे वेळ, शक्ती ह्यांचा अपव्यय!  ते काहीच करत नव्हते. वरिष्ठ मंडळी हॉटेल्स वगैरेची सोय करत असावीत बहुतेक, आणि तोपर्यंत खिंड लढवण्यासाठी ह्यांना पाठवलं असावं. ते काम त्यांनी अर्थातच चोख बजावलं. त्यांच्याच म्हणण्याप्रमाणे हे नेहमीच होत असतं तेव्हा काळजी करू नका, आम्ही हॉटेल वगैरे ची व्यवस्था करू . (आर आर पाटलांच्या शब्दांत सांगायचं तर 'ऐसे बडे शेहरोंमे ऐसी छोटी मोटी घटनाए होती रेहती है'). नंतर दुसऱ्या दिवशी हॉटेल मध्ये वगैरे चौकशी केल्यावर कळाले कि खरच Air India साठी हे नेहमीचच आहे. त्यामुळे त्यांची हॉटेल्स वगैरे पण ठरलेली आहेत.

शेवटी घसे सुकल्यावर लोकांनी माघार घेतली आणि तमाशा संपला. ब्यागा परत घेणे, बोर्डिंग पास रद्द करणे वगैरे सोपस्कार झाले आणि मग आम्ही गाड्यांमधून हॉटेल्सकडे रवाना झालो. विमानतळाबाहेर आलो आणि गाड्यांकडे जात होतो तेव्हा बाहेर पत्रकार टपलेलेच होते. लग्गेच त्यांनी कॅमेरे सरसावून 'बाईट' साठी 'चावायला' सुरुवात केली. त्यांना फारसा भाव न देता आम्ही निघालो. खूप उशीर झाला होता आणि झोप येत होती. मुंबई मध्ये राहणारी लोकं आपापल्या घरी गेली.


Air India च्या लोकांनी आमची सोय मात्र चांगल्या हॉटेल मध्ये केली होती. जेवण आणि विमानतळावर जाणं येणं  ह्याची सोय पण चांगली होती. सकाळी न्याहारीला फळे आणि पावभाजी होती. जुहु किनाऱ्याच्या अगदी जवळच होतं हॉटेल. त्यामुळे मुंबई चा सुप्रसिद्ध जुहु बीच पहिला. अर्थातच मी एकटाच होतो (इथे एक दीर्घ उसासा! :-D ). बरोबर माझ्याच विमानामधला मित्र होता. तिथे चालणारे सगळे प्रकारही पहिले. ह्यासंदर्भात अधिक माहिती हवी असल्यास इच्छुकांनी 'मुंबईचा जावई' हा जुना मराठी सिनेमा पहावा. जुहु बीच वर शिवाजी महाराजांचे एक स्मारक देखील आहे. नंतर आसपासचा परिसर पहिला. नट-नट्यांचे बंगले त्याच भागात आहेत म्हणे. पण आम्ही काही गेलो नाही.दुपारी जेवण झाल्यावर सुस्ती आली आणि परत झोप काढली.

संध्याकाळी परत जुहु बीच वर फेरफटका मारला. बरोबर विमानातालीच मंडळी होती. एकजण सिंगापूर मध्ये नोकरी करणारा होता. दुसरा नोकरी करता करता NTU मध्ये पार्टटाईम मास्टर्स करणारा होता. तिसरा माझ्याच सारखा NTU मध्ये PhD करणारा होता. चार मराठी माणसं एकत्र जमल्यावर काय होणार.. विविध विषयांवर घनघोर चर्चा झाल्या. कॉंग्रेस, क्रिकेट, पुण्यातली इंजिनीरिंग कॉलेजेस आणि त्यांच्या भरमसाट फिया, बाळासाहेबांच निधन आणि शिवसेना, सिंगापूर मधील नोकर्यांची सद्यस्थिती आणि विशेषतः Air India चा हलगर्जीपणा, NTU, अमेरिका आणि IIT मधील अभ्यासक्रम, शिक्षणपद्धती आदी विषयांवर सर्वजण अगदी हिरीरीने बोलले. माझी भूमिका बहुतांश वेळ श्रोता म्हणूनच मर्यादित होती. अधून मधून मी विषय बदलायला किल्ली देत होतो एवढच.

दुसऱ्या दिवशी त्यांनी त्या दिवसाची लोकं आणि आम्ही अश्या सगळ्यांची एकाच विमानात सोय करण्यासाठी मोठं विमान मागवलं होतं. त्यामुळे त्या दिवशीचे उड्डाण अजून २ तास उशिरा होणार होतं. दुसऱ्या दिवशीसुद्धा Air India चा सावळा गोंधळ चालूच होता. गेट वर तिकीट तपासून आत सोडणाऱ्या जवानांना आमच्याबद्दल काहीच सांगण्यात आले नव्हते. आमच्याकडे नवीन तिकीट नसल्याने ते आम्हाला आत सोडेचनात. मग त्यांना सगळं सांगून, पटवून देण्यात परत वेळ गेला. खरतर त्यांना एक सूचना देऊन ठेवायला किंवा तिथे Air India चे अधिकारी ठेवायला काय जात होतं, पण नाही. आत गर्दी पण खूप होती. कारण दोन दिवसांचे सगळे प्रवासी एकदम आले होते. लोकांची आणि कर्मचाऱ्यांची किरकोळ कारणांवरून भांडणं चालू होती. त्यातच अफवा पसरली कि आजच्या विमानात पुरेश्या जागा नाहीयेत. त्यामुळे अजूनच धावपळ, गोंधळ! त्यांना मोठे विमान मागवल्याचे अधिकृतरीत्या सांगायला काय जात होतं, पण नाही.

ह्या सगळ्या प्रकारानंतर एकदाचे बोर्डिंग गेटपाशी गेलो. मग ठरलेल्या वेळी विमानात जाउन बसलो. बसलो आणि मला जी झोप लागली ते थेट विमान उतरायच्या वेळी मला जाग आली. (Air India च्या विमानात जागं राहून फारसा काही उपयोग नसतो. हवाई 'सुंदऱ्या' नसतात. सगळ्या काकवा असतात.) मधेच एकदा एका हवाई सुंदराने जेवण आणले तेव्हा त्यातली फळे खाल्ली एवढंच. विमान उशिरा निघाल्याने उशिरा उतरलं. त्यामुळे मग रूमवर पोहोचलो तेव्हा दुपार उलटून गेली होती. तेव्हापासून नुसता आळस भरलाय अंगात.

जुहु परिसरात फिरताना पाहिलेली Air India ची जाहिरात -

3 comments:

  1. छान लिहिलंयस.
    उसासे टाकायची वेळ येत आहे, तेच चांगले आहे... पश्च्यात्तापापेक्षा :)

    ReplyDelete
    Replies
    1. hahahaha.. :-)
      anubhavache bol!! :-D

      Delete
    2. mark vadhavun ghenyachi upama agadi marmik..khup chan
      -Anant

      Delete