Friday, April 12, 2013

12. 'पाडवा विशेष' : एक अभिनव राजकीय प्रयोग!


शालिवाहन शके १९३५, माहे चैत्र
तिथी शुद्ध प्रतिपदा
गुढीपाडवा

सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा!  
श्रीखंड-पुरी, कडूनिम्बाची चटणी आणि गाठीच्या हाराची पदके खाऊन सर्वांनी पाडवा साजरा केला असेलच.
मी मात्र चक्का गाळून श्रीखंड करणं, कडूनिंब आणणं, पाटा-वरवंट्यावर कडूनिंबाची चटणी करणं आणि पंचांग हि दरवर्षीची माझ्याकडची कामं 'miss' केली. आज संध्याकाळी मी, सुमित, अक्षय आणि रोहित 'श्री लक्ष्मीनारायण' देवळात गेलो. त्याआधी दातारांच्या 'पेशवाई' मध्ये श्रीखंड, राजगिरा वडी वगैरे खरेदी केली. मग 'Mumbai 2 Goa' नावाच्या हॉटेलात गेलो. शाकाहारी लोकांसाठी फारसे options नाहीयेत, पण ठीकठाक आहे. महत्वाच म्हणजे तिथे जेवणावर 'complementary dish' म्हणून मिळालेली श्रीखंड पुरी खाणे झाले.     
पुण्यामधील सर्व आप्तेष्टांना विनंती: आता रामनवमीला सर्वजण सालाबादप्रमाणे ग्राहक पेठेत जालच. तेव्हा रामाला माझा नमस्कार सांगा. माझ्या वाटचे पन्हे प्यावे आणि सुंठवडा घ्यावा. :-)

असो तर आता मुख्य विषयाकडे वळूयात!

खरं तर आज काय लिहाव असं वाटत होत. एक तर सर्व वर्तमानपत्रांमधून पाडव्याच्या गोष्टी वगैरे आल्या असतील. गुढी उभारणे, कडूनिंबाची पाने खाणे ह्याचे महत्व सांगणारे दर वर्षीचे तेच तेच लेखहि आले असतिल. हल्ली जस ह्या मंडळाचा देखावा पुढच्या वर्षी त्या मंडळाकडे असतो आणि त्या मंडळाचा देखावा आणखीन तिसऱ्या मंडळाकडे जातो (अपवाद - काही चांगली मंडळे. उदा: गवळीवाडा मंडळ); तसंच ह्या वर्तमानपत्रान्मधल्या लेखांचं असतं. तोच तोच मजकूर वेगळ्या वेगळ्या वर्तमानपत्रांमधून प्रसिद्ध होतो. सर्व धुरंधर संपादक आपल्या अग्रलेखान्मधून महत्वाच्या घडामोडींचा उहापोह (अर्थातच त्यांच्या मालकांना ज्याचा त्रास होणार नाही अश्याच घडामोडी आणि अश्याच भाषेत!) करतात आणि बहुतांश लेखांमध्ये/ लेखांच्या शेवटी 'आपण सर्वांनी एकत्र येउन - - - ची गुढी उभारली पाहिजे' हे किंवा अश्या आशयाच वाक्य असतच! (इथे - - - च्या जागी काही सद्गुण, सामाजिक परिस्थितीशी निगडीत कार्ये ह्यांचा समावेश करावा).  

आपल्याकडे होळीच्या दिवशी बोंब मारण्याची प्रथा आहे. काही सभ्य माणसे देखील होळीच्या दिवशी 'राजयोगी' होऊन (म्हणजे काही 'विशेष पेय' प्रश्न करून) अर्वाच्य भाषेत बोलतात. एरवी सभ्यपणे वागणाऱ्यानसाठी आपल्या थोर पूर्वजांनी आपल्या थोर संस्कृतीत हि सोय करून ठेवली आहे. परंतु आपले - - पुढारी ह्या संस्कृतीत बसत नाहीत (इथे - -  च्या जागी वर्तमानपत्रात येणाऱ्या विशेषणाचा समावेश करावा उदा; आदरणीय(?) वगैरे वगैरे). तर अश्याच एका (स्वघोषित) 'टग्या' पुढाऱ्याने नुकतीच गटारगंगा ओकली. त्यांची बहुतेक होळीच्या दिवशी घेतलेली अजूनही उतरली नसावी. किंवा रोजच राजकीय धुळवड चालू असल्याने अजूनही होळीच सुरु आहे असा गैरसमज होऊन सकाळी सकाळीच (बहुतेक पहिल्या धारेची) टाकून आल्यामुळे महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणार नाही अशी भाषा त्यांनी वापरली. महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला (?) अर्वाच्य शब्दांची रेलचेल असलेली भाषणे काही नवीन नाहीत (जिज्ञासूंनी दुसऱ्या एका दादाची - सुप्रसिद्ध दिवंगत मराठी अभिनेत्याची आणि नुकत्याच दिवंगत झालेल्या महानेत्याची भाषणे ऐकावीत - headphones लावून! Youtube वर मुबलक संख्येने उपलब्ध असतील). त्यामानाने हि भाषा अगदीच साधी होति. पण ह्या वाक्यान्मागाची भावना मात्र अगदीच चुकीची होती. जी लोकं तुमच्याकडे (तुमची लायकी नसली तरी तुमच्याकडे सत्ता आहे म्हणून) मदतीच्या आशेने बघताहेत त्यांची तुम्ही टर उडवता? धरणात पाणी नाही म्हणे. शेती आणि पिण्यासाठी सोडून इतर सगळ्या कामांसाठी पाणी कसं असतं धरणांमध्ये? आपण सगळ्यांनी एकत्र येउन हे प्रश्न ह्या मुजोर लोकांना विचारलेच पहिजेत. IPL साठी, होळी, रंगपंचमीसाठी, श्रीमन्तांच्या बंगले आणि इतर बांधकामांसाठी, राजकीय लोकांच्या wine आणि इतर पाणीखाऊ उद्योगांसाठी मात्र कसं पाणी असतं? गेलं कुठे पाणी? तुमच्या हजारो कोटींच्या योजनांच काय झाला? गेली अनेक वर्षे चालू असलेल्या योजनांमध्ये कुठे तरी पाणी मुरतंय का? तुमचा पैसेखाऊपणा आणि करंटेपणा तुम्ही दुष्काळाच्या नावाखाली झाकू पाहताय! तुम्हाला पाण्याच नियोजन करता येत नाही! (संदर्भ: http://www.thehindu.com/news/national/other-states/maharashtra-drought-manmade-analysis/article4577079.ece). काही वर्षांपूर्वी कोट्यावधी रुपये खर्चून कृत्रिम पाउस पाडण्याचे प्रयोग झाले होते. त्याचं पुढे काय झालं? ह्या सगळ्याबद्दल हे वर्तमानपत्रवाले काही बोलणार नाहीत! त्यांच्याच मालकांचे (राजकीय नि आर्थिक) हितसंबंध गुंतलेले असतात नं ह्यात!

दुसरा मुद्दा म्हणजे सध्याचे पुण्याचे खासदार! आपल्या मतदारसंघात घालवला नाही एवढा वेळ त्यांनी (आपल्या सुदैवाने) कोर्टात आणि तुरुंगात काढला! त्यांना देखील त्यांची जागा दाखवून देण्याची वेळ आली आहे. लोकसभेच्या निवडणुका आता येतीलच तेव्हा ह्या अश्या निर्लज्ज लोकांना आपणच पाडलं पाहिजे. ह्यावेळी पुण्यातून कोण उभं राहील काही माहिती नाही. विद्यमान खासदारांना पुन्हा संधी मिळेल किंवा नाही ते माहित नाही. तसेच काही सांगता येत नाही घड्याळवाले सुद्धा कदाचित त्यांचा उमेदवार उभा करतील. पण आपण मात्र ह्या लोकांना भाव देऊ नये. इतर राजकीय पक्ष देखील काही फारसे चांगले नाहियेत. अर्थात दगडापेक्षा वीट मऊ ह्या न्यायाने ते जरा बरे आहेत एवढंच.

असो. राजकारणी लोकांबद्दल जास्त काय बोलणर. गुंड पोसणारे हे लोक. आमच्या एका सुविद्य मित्राने साधारणपणे ह्याच विषयावर लिहिलेला लेख बरेच काही सांगून जातो (अमेय सवडकर: https://www.facebook.com/notes/ameya-sawadkar/of-saving-money-for-things-essential-for-living/10151340163946835 ). ह्या लोकांना सत्तेवरून आपणच खाली ओढलं पाहिजे. एखादी वस्तू निरुपयोगी झाली कि आपण बदलतो, तसच आता हे घड्याळ निरुपयोगी आणि उपद्रवी झाल आहे. ते बदललच पाहिजे.

आता ह्या लोकांवर थोडफार तोंडसुख घेतल्यानंतर पक्का पुणेकर ह्या नात्याने मी इथे काही उपदेश करणं ओघानेच आलं. तसं पक्का पुणेकर म्हणून आम्ही पहिल्याच लेखात आणि नंतरही टाळ्या वसूल केल्या आहेतच. आमच्या दुसऱ्याच post मध्ये आम्ही इतिहासाची देखील आठवण करून दिली आहे. पण ह्यावेळी जरा अजून थोडा उपदेश आणि थोडं भावनिक आवाहन करण्याचं मनात आहे.

तर सुमारे वर्ष-दीड वर्ष आमच्या मनात असलेली गोष्ट आज आम्ही इथे सांगत आहोत. आमच्या मते सध्या पुण्याचे प्रतिनिधित्व करायला एकच लायक उमेदवार आहे. परंतु त्यांनी सध्या राजकीय संन्यास घेतला असावा असा वाटतंय. अर्थात काहीजण त्यांनी पूर्वी मारलेल्या राजकीय कोलांट्या-उड्यांमुळे नाक मुरडतील, पण त्या उमेदवाराला प्रशासकीय कामकाजाचा आणि निवडणुकीचा देखील अनुभव आहे. सुज्ञ जनास अधिक सांगणे न लगे! आपण ओळखलच असेल मी कोणाबद्दल बोलतोय ते!  अमोघ वक्तृत्व, सुसंस्कृत, सुविचारी, तरुणांमध्ये प्रिय असं हे व्यक्तिमत्व आहे. 'अस्वस्थ दशकाची डायरी' लिहिणाऱ्या ह्या माणसाला समाजाची चांगली जाण आहे. आज आपल्याला अश्याच नेतृत्वाची गरज आहे! आम्ही internet वरून बरीच बडबड आणि publicity करू शकतो पण पुण्यामध्ये असलेल्या तरुणांना आणि सर्वांनाच आमचे हे जाहीर आवाहन आहे कि आपण जर काही प्रयत्न केले तर आपण त्यांचे मन कदाचित वळवू शकू. आज जनतेनेच 'दादा'गिरी आणि 'भाई'गिरी संपवून आपला उमेदवार उभा करण्याची गरज आहे!  अनेक सामाजिक आणि स्वयंसेवी संस्था देखील त्यांना पाठींबा देऊ शकतात कारण ते स्वच्छ चारित्र्याचे आहेत. सर्वसामान्य माणसांच्या आणि विशेषत: तरुणांच्या मनात त्यांच्याबद्दल आदरच असेल. ह्याबद्दल पुन्हा एकदा आम्ही सविस्तरपणे लिहूच! 

ह्या बाबतीत सुज्ञ, सुविद्य, विचारी अश्या पुणेकरांनी एकत्र येउन काहीतरी करावे अशी आमची इच्छा आहे. आपण सर्वजण internet वरून, इतर मार्गांनी किंवा खाजगीतही सध्याच्या राजकीय परिस्थितीबद्दल असंतोष व्यक्त करतच असतो. पण आता मात्र कृतीची वेळ आली आहे. पुण्यात चांगली चांगली कामे करणाऱ्या अनेक स्वयंसेवी संघटना आहेत. पुण्याचा भल्यासाठी सर्वांनी आपले हेवेदावे विसरून आणि बिगर-राजकीय राहण्याचे धोरण बाजूला ठेवून ह्याबाबत पुढाकार घ्यावा हीच एक पुणेकर तरुण म्हणून माझी इच्छा आहे! आपलं पुणं राजकीय मुत्सद्देगिरीच्या बाबतीत नेहमीच आघाडीवर राहिलं आहे. तेव्हा हा एक अभिनव प्रयोग ह्या लोकसभा निवडणुकीसाठी आपण सर्वांनी करावा आणि एका नवीन क्रांतीची सुरुवात करावी अशी आमची इच्छा आहे! 

आमच्या ह्या आवाहनाचा वाचकांनी जरूर विचार करावा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आमचे विचार पोहोचवावेत अशी आमची अपेक्षा आहे!

टीप: इथे व्यक्त केलेले विचार पूर्णत: वैयक्तिक स्वरूपाचे आहेत. समविचारी लोक एकत्र आल्यास तसेच अश्याच प्रकारे इतर ठिकाणी देखील उमेदवार उभे केल्यास आम्हाला आनंदच होईल!

इति लेखनसीमा!
-
सुमेध ढबू

रत्नाकरधौतपदां हिमालयकिरीटिनीम् ।
ब्रह्मराजर्षिरत्नाढ्यां वन्दे भारतमातरम् ॥

2 comments: