Sunday, May 3, 2015

33. ऐका चणकोबा तुमची कहाणी!

     चणकोबा म्हणजे मूळच्या ‘चाणक्य’ ह्या शब्दाचा अपभ्रंश होऊन तयार झालेले बोलीभाषेतील रूप. कहाणी अशी आहे...

     ऐका चणकोबा तुमची कहाणी..

     निर्मल मळे, उदकाचे तळे, सुवर्णाची कमळे, देवाची देवळे!

     आटपाट नगर होतं, नगरात राजपुत्र होता. राजपुत्राला माता होती. राजमातेला राजपुत्राची काळजी. राजपुत्र महामूर्ख आणि आत्मकेंद्री होता. भर दरबारात, भर सभेत वाट्टेल तसे बरळणे, सर्वांचा अपमान करणे हेच काय ते त्याचे कर्तृत्व! काही दरबारी आणि बरीचशी प्रजा नाराज होती, पण राजमातेचा धाक मोठा. शिवाय ह्या राजवंशाची परंपरा मोठी! राजपुत्राचे प्रपितामह, पितामही, पिता अशा सर्वांनी नगरावर राज्य केले होते. ह्या राजवंशाचे एक वैशिष्ट्य म्हणजे भाट आणि स्तुतिपाठक लोकांना भरपूर मान! जो जास्त लाळघोटेपणा करेल त्याला जास्त मानमरातब मिळेल, मंत्रिपद मिळेल हा इतिहास! त्यामुळेच श्वानवंशीय (डोग्विजय इत्यादी) विदुषकांनी दरबार सदोदित भरलेला! ह्या भाट लोकांनी घाट घातला. राजपुत्राचा राज्यारोहण सोहळा करायचा! जनतेत अस्वस्थता होतीच ती अधिकच वाढू लागली.

     तसेही राजमातेच्या राज्यात सर्वकाही आलबेल होते असे नाही. राजमातेला काही प्रजाजनांचा विरोध, कारण ती मूळची दुसऱ्या देशीची. त्यामुळे ‘अंतरात्म्याचा आवाज’ वगैरे ढोंग करून आपल्या एका मूक, वृद्ध दरबाऱ्याला पंतप्रधानपदी नेमुन त्याच्याकरवी ती राज्य चालवीत होती. राजमातेच्या राज्यातील कारभारी अति भ्रष्टाचारी, माजलेले होते. (ह्यासंदर्भातील तत्कालीन कविता इथे मिळेल:http://sumedhdhabu.blogspot.sg/2013/01/soniya.html) शेतकरी आत्महत्या करीत होते. दुसऱ्या नगरीचे सैनिक येऊन आटपाट नगरच्या सैनिकांची शिरे कापून जायचे, तरीदेखील पंतप्रधान ढिम्म! एका विशिष्ट समाजाला झुकते माप देण्याची कारभाऱ्यान्मधे स्पर्धाच चालू होती. सर्वसामान्य प्रजा हे सर्व मूकपणे बघत होती. असंतोष वाढत होता. काही ठिकाणी असंतोषाचा उद्रेक होऊ लागला होता. ह्याच काळात राजपुत्र सार्वजनिक जीवनात देखील मुर्खासारखा वागू लागू लागला. जनतेबद्दल काहीबाही बोलू लागला. भाट लोकांची योजना कळल्यावर मात्र मोठ्या प्रमाणावर उद्रेक होणार अशी चिन्हे दिसू लागली.

     ह्या सर्व परीस्थितीत काय करावे अश्या चिंतेत प्रजेतील जुनीजाणती मंडळी होती. ‘कोण? कुठला? कधी? कश्याप्रकारे? नक्की करेल?’ असे प्रश्न त्यांना भेडसावत असत. एक दिवस चमत्कार झाला. एका मठाधिपतींना दृष्टांत झाला. प्रत्यक्ष चणकोबा त्यांच्या स्वप्नात आला आणि म्हणाला, “उठा! कामाला लागा. तुमच्या मनातील प्रश्नांची ही उत्तरे! दोन वर्षे मेहनत करा. इतिहासाची पुनरावृत्ती होणार आहे. पश्चिम दिशेला पूर्वीच्या द्वारकानगरीजवळील संस्थानाचा कारभारी जो नरेंद्र, त्याला राज्यपदी बसवा. पूर्वी मी ज्या पद्धतीने चंद्रगुप्ताला राज्यपदी बसवून सत्तांध, कामचुकार नंद घराण्याची सत्ता संपुष्टात आणली तसेच पुन्हा एकदा सत्तापरिवर्तन करा. हा संस्थानिक चांगला आहे. जनतेतील मान्यवरांनी त्याच्या कारभाराबद्दल संतोष व्यक्त केला आहे. महत्वाचे म्हणजे तो मूळचा तुमच्याच मठाचा शिष्य आहे. असा योग पुन्हा येणार नाही. तो स्वतःचे नाव सार्थ करील.” इतुके बोलून चणकोबा अंतर्धान पावला.

     प्रत्यक्ष चणकोबाच्या दर्शनाने भारावून गेलेल्या मठाधीपतींनी हा दृष्टांत सर्वांना सांगितला. नरेंद्रच्या अधिपत्याखाली सर्व संस्थ्निकांची एकजूट करून राज्यपालट करण्याचा बेत आखला. काही वयोवृद्ध संस्थानिकांचा अपवाद वगळता सर्वांनी संमती दिली. विरोध मोडून काढून नरेंद्रच्या अश्वमेधाचा वारू आटपाट नगरभर फिरला. सर्वकाळ राजघराण्यातील सर्वजण ‘आप’ल्याच धुंदीत होते. राजपुत्राचे माकडचाळे आणि भाट लोकांचे लाळ घोटणे चालूच होते. आणि व्हायचे तेच झाले. चणकोबाची वाणी खरी ठरली. दोन वर्षे सरली आणि एके दिवशी वैशाखवणव्यात राजवंश होरपळून निघाला. आटपाट नगरात सत्तांतर झाले.

     आता नरेंद्र आटपाट नगराचा कारभार बघू लागला. जनतेला जुन्या आणि नव्या राज्यातील फरक जाणवू लागला. पूर्वी दुसऱ्या नगरीचे सैनिक आटपाट नगरीचे सैनिक मारून गेले तरी कोणी काही बोलत नसे. पण आता मात्र त्यांनी कुरापत काढण्याचा प्रयत्न करताच नरेंद्रच्या आदेशाने त्यांना चोख प्रत्युत्तर दिले गेले. आटपाट नगरीच्या विकासासाठी आणि स्वयम्पुर्णतेसाठी नरेन्द्राने महत्वाकांक्षी योजना आखल्या. त्यासाठी नरेंद्रने इतर नगरी जाऊन तेथे आटपाट नगरीबद्दलचे प्रतिकूल असलेले मत अनुकूल बनवले. तेथील व्यापारी व्यापारासाठी आटपाट नगरी येण्यास उत्सुक बनले. विविध कारणांनी इतर नगरी स्थायिक झालेले पण मूळचे आटपाटनगरवासीय देखील नरेंद्राची स्तुती करत असत. एका नगरीमध्ये मानवनिर्मित पेचप्रसंग ओढवला आणि दुसऱ्या एका नगरीमध्ये नैसर्गिक आपत्ती आली असता, नरेंद्रच्या शिलेदारांनी समयसूचकता दाखवून अत्यंत योग्य पद्धतीने, केवळ आटपाट नगरीचेच नव्हे तर इतर नगरवासियांचे देखील प्राण वाचवले आणि मदतकार्य केले!  

     अश्याप्रकारे हि कहाणी (मठाधीपतींना चणकोबाने दृष्टांतात दिलेल्या) पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण झाली. शुक्ल पक्षाच्या चंद्रकलेप्रमाणे नरेंद्राचा आणि आटपाट नगरीचा उत्कर्ष वर्धिष्णू आहे, राहो, नरेंद्रच्या उत्कर्षाची पौर्णिमा शक्य तितक्या उशिरा येवो, ह्या कथेचे वाचन, श्रवण करणाऱ्यास चणकोबा प्रसन्ना होवो हीच चणकोबाचरणी प्रार्थना!                      

---------------------------------------------------------------------------------


     नरेन्द्राच्या राज्यात भाटांना स्थान नाही. त्यामुळे पूर्वीच्या राजवंशाच्या काळातच अजूनही रमणारे लोक आजकाल हि मूळ कहाणी बदलून सांगण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. नरेंद्राचा उत्कर्ष बघून राजपुत्र दिवाभीतासारखा पळून गेला. नवीन वर्षाचे दोन मास सरल्यानंतर तो परत आला. जाहीर मेळाव्यांमधून त्याचे अज्ञान उघडे पडतेच आहे. माकडचेष्टा सुरूच आहेत. त्याच्या अज्ञातवासाच्या काळात त्याने काही आत्मचिंतन केले आणि नवीन उत्साहाने परत आला असे भासवण्याचा आणि त्यालाच आज कथेचा नायक बनवून खोटी कथा सांगण्याचा प्रयत्न होत आहेत.

    ह्या एका जुन्या कहाणीचे आजकाल पुनर्लेखन केले गेले आहे. आजकाल सगळा इतिहास बदलण्याचे जे प्रकार होत आहेत, त्यातलाच हा एक प्रकार असावा असा आम्हाला वहीम आहे. उदा. औरंगजेबाला सुफी संतपदी बसवणे, अफझुलखान हा शिवाजी महाराजांची सदिच्छा भेट घ्यायला आला होता त्यामुळे शिवाजी महाराज अफझुलखानाचा कोथळा बाहेर काढतानाचे चित्र कुठेही न लावणे, नेहरू आणि मंडळींनी उचलून धरलेल्या विसाव्या शतकाच्या उत्तरार्धातील सेकुलर राज्य वगैरे संकल्पना सोळाव्या शतकातील मुसलमानी धर्मांध सत्ता खिळखिळी करून मराठी साम्राज्य स्थापन करून ह्या हिंदुस्थानातील हिंदूंना न्याय मिळवून देणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज ह्यांच्या संदर्भात वापरून त्यांचे विचार आणि कर्तृत्व केवळ स्वतःच्या राजकीय, सामाजिक फायद्यासाठी संकुचित करणाऱ्या आणि आजकाल केवळ एका विशिष्ट समाजाला शिव्या देणाऱ्या कर्तुत्वशुन्य, चरित्रहीन अश्या केकाटे, खोडकर प्रभृती मंडळींच्या खोट्या इतिहासाप्रमाणे तयार केलेली हि खोटी कहाणी आम्हाला वाचायला मिळाली (हि खोटी कहाणी तुम्हाला इथे वाचता येईल: http://epaperdivyamarathi.bhaskar.com/magazine/rasik/244/03052015/0/2/ किंवा https://www.facebook.com/photo.php?fbid=1008096795887726&set=a.327089870655092.82596.100000622444353&type=1), म्हणून आम्ही इथे मूळ कहाणी देत आहोत. तेव्हा भाविकांनी अश्या गोबेल्स पद्धतीच्या प्रचाराला बळी पडू नये आणि त्यांची श्रद्धा ढळू नये हीच ईश्वराचरणी प्रार्थना!

Friday, April 17, 2015

32. झेंडूचे फूल - हे भलते अवघड असते!

हे भलते अवघड असते

मित्राच्या पार्टी मध्ये कुणी ओळखीचे नसताना
रात्रीच्या वेळी आणि बोर होत असताना
तुम्ही केविलवाणे बसता (२),
अन् कोणी 'एकटे' नसते!

'चल, निघुया येथून आता',
मन कंटाळूनिया म्हणते
इतुक्यात दिसे ती बाला (२)
पाउल पुढे ना पडते!

पाहुनी गोड तो चेहरा
मन विरघळून कि जाते
पण धीर होत नसल्याने (२)
घोड्याचे गाडे अडते!

"ए ओळख दे रे करुनी", दोस्तीची आण मित्राला
अन् 'हाय, हेलो' च्या भोवती संभाषण सुरु होताना
मैत्रीच्या मार्गावरुनी (२)
मग गाडी सुसाट सुटते!

विषयांना नाही तोटा,
बोलणे अनावर होते
जुळतील येथल्या तारा (२)
हे एका क्षणात पटते!

तुम्ही म्हणता मनात आता, शब्दात भावना ओतू,
इतुक्यात म्हणे ती 'भावा, कधी गावा येशील का तू'
तुम्ही सबबी देऊन काही, काढता पाय मग घेता,
एकांती दीर्घ उसासा (२)
अन् पुन्हा कि मग 'जैसे थे'!


----------------------------

तुम्ही म्हणता मनात आता, शब्दात भावना ओतू,
इतुक्यात म्हणे ती 'मजला कळतात तुझे रे हेतू'
ती हसुनी निघून जाते, जाताना नंबर देते,
निघताना पार्टीमधूनी, चेहेऱ्यावर हास्य कि खुलते!